उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत अाहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी ही पाणीपातळी १६.०९ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. सध्या पाण्याचा विसर्ग बंद आहे, पण पूर्वीचे पाणी अद्यापही धरणात येत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने चढ-उतार झाला. पण अलीकडच्या दोन-तीन दिवसांत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने उणेमध्ये गेलेले धरण अवघ्या दोनच दिवसांत प्लसमध्ये आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह कमी असला, तरी पूर्वीचे पाणी उजनी धरण्यात येऊन मिसळत असल्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. दौंड येथून शुक्रवारी १६ हजार १९७ क्युसेकने पाणी येत होते. तर बंडगार्डन येथील विसर्ग बंद राहिला. पण पुढील एक-दोन दिवसांमध्ये धरणाच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील पाऊसही आता थांबला आहे, तो पुन्हा सुरू झाल्यास पाणी आणखी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास धरणाची एकूण पाणीपातळी ४९२.२०० मीटर इतकी होती. तर एकूण पाणीसाठा २०१६.९१ दशलक्षघनमीटर (७२.२८ टीएमसी) आहे. तर त्यापैकी उपयुक्त साठा २४४.१० दशलक्षघनमीटर (८.६२ टीएमसी) इतका आणि पाण्याची टक्केवारी १६.०९ टक्के इतकी होती.