पुणे/नाशिक ः शेतकरी, कामगार, राज्य सरकारचे सर्व विभाग आणि कर्मचारी कोरोनाशी मुकाबला करत असताना, आता बाजार समिती कर्मचारी संघाने राज्य सरकारला समित्या बंद करण्याचा इशारा दिला आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा उतरवा अन्यथा बाजार बंद करू, असे निवेदन संघाच्या वतीने पणन संचालकांना देण्यात आले आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा विळखा देशाला आणि राज्याला पडला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक घटक कोरोनाशी लढत आहेत. कोरोना संकटात शेतीमाल पुरवठा साखळी सुरळीत राहून शेतीमालाचे नुकसान होऊ नये आणि नागरिकांची देखील भूक भागली जावी यासाठी शेतीमाल वाहतुकीसह बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या स्थितीत सर्वच बाजार घटक कोरोनाशी लढत आहेत. यामध्ये शेतकरी, बाजार समिती कर्मचारी, हमाल, तोलणार, कामगार, शेतीमाल वाहतूक करणारे वाहन चालक आदी विविध घटक कार्यरत आहेत.
राज्यात सात हजार कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता बाजार समित्यांमध्ये सेवा देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा व शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समित्यांमध्ये फळे, भाजीपाला व भुसार लिलावाचे कामकाज करीत आहे. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे पणन संचालक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत किशोर सुभाष चव्हाण या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या कुटुंबांस शासनामार्फत कोणतीही मदत अथवा विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाजार समिती कर्मचारी अत्यावश्यक सेवेत काम करत असताना सुद्धा शासनाने त्यांना विमा कवच दिलेले नाही. तरी महाराष्ट्रातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचा विमा व इतर सुविधा तत्काळ लागू करण्यात याव्या, अशी मागणी पणन संचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये कर्मचारी कोरोना बाधित होऊन जीवितास मुकले. त्यांच्या पश्चात कुटुंबियांना बाजार समिती व्यवस्थापन व शासनाने कुठली मदत तर दूर साधी विचारणा केलेली नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहोत. अन्न साखळी सुरक्षित राहील यास बांधील आहोत. मात्र, शासनाने इतर अत्यावश्यक सेवेतील घटकांप्रमाणे आमचा विचार करावा. बाजार समिती कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही भूमिका घेतली आहे. - दिलीप डेबरे, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे
वैयक्तिक विमा उतरवू शकतात. प्रत्येक बाजार समिती आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना राबवीत आहे. त्या योजनेमध्ये विविध आजारांचा समावेश आहे. तसेच आता कोरोना विमा योजना सुरू आहे. ती विमा पॉलिसी प्रत्येक कर्मचारी वैयक्तिकरीत्या काढू शकतो. त्यामुळे ५० लाखांच्या विम्याची योजना सध्या तरी विचाराधीन नसल्याचे पणन संचालनालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.