‘जलयुक्त’मधून होणार सात हजार कामे
‘जलयुक्त’मधून होणार सात हजार कामे 
मुख्य बातम्या

‘जलयुक्त’मधून होणार सात हजार कामे

टीम अॅग्रोवन

नगर ः जलयुक्त शिवार अभियानासाठी नगर जिल्ह्यामधून यंदा २०१८-१९ या वर्षामध्ये २४९ गावांत ७ हजार ८७ कामे होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा समितीने २४८ कोटी २८ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आठ दिवसांत प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये या योजनेतून जास्तीत जास्त कामे व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्याने गेल्या दहा वर्षांत नगर जिल्ह्याने अनेक दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. मध्यंतरी दोन वर्षे तर अगदी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी भटंकती करावी लागली. केवळ पाणीपुरवठ्यावर प्रशासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. टंचाईमुळे शेतीही पूर्णतः धोक्‍यात आली. हीच स्थिती कमी-जास्त प्रमाणात राज्यभर होती.

दुष्काळावर मात करण्यासह शेतीला शाश्‍वत पाणी उपलब्ध व्हावे, राज्यातील टंचाई संपूर्णपणे दूर होऊन राज्य टॅंकरमुक्त व्हावे, यासाठी २०१५-१६ पासून कृषी विभागासह अन्य विविध योजनांचा ताळमेळ घालत ‘जलयुक्त शिवार अभियान’ सुरू केले. पाच वर्षे सलग टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासह दुष्काळी स्थिती, सिंचनाचा अभाव, अशा काही निकषांवर जलयुक्त शिवार अभियानासाठी गावांची निवड केली.

पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६८, तिसऱ्या वर्षी २४१ गावे निवडली. या तीन वर्षांत जलयुक्तवर सुमारे तीनशे कोटींपेक्षा जास्ती खर्च झाला आणि सुमारे पंचवीस हजारांपेक्षा अधिक कामे मार्गी लागली. यंदा चौथे वर्ष असून, निकषानुसार २४९ गावांची निवड केलेली आहे. यंदा निवडलेल्या गावांत आत्तापर्यंत अभियानात ७८८ गावे झाली असून, आता जिल्ह्यातील सर्व गावे संपली आहेत.

यावर्षीच्या २४९ गावांत कामे करण्यासाठी जिल्हा समितीने २४८ कोटी २८ लाख रुपये किमतीचे ७ हजार ८७ कामे निश्‍चित केली आहे. आराखड्याला समितीने मंजुरी दिलेली आहे. आठ दिवसांत सबंधित कामाचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी सांगितले.

प्रलंबित कामे पूर्ण करा जलयुक्त शिवार अभियानात गतवर्षी निवडलेल्या २४१ गावांतील कामे अजूनही काही प्रमाणात प्रलंबित आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सोमवारी (ता. २७) सूचना दिल्या आहेत. दोन-तीन वर्षांत झालेल्या कामाचा फायदा झाल्याचे नमूद केले आहे. यंदा जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या कामांनाही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आराखड्याची स्थिती एकूण गावे ः २४९ मंजूर कामे पूर्ण करणे ः ६१ नव्याने घ्यावयाची कामे ः ४८७८ दुरुस्ती व बळकटीकरणाची कामे ः २१४८ एकूण रक्कम ः २४८ कोटी २८ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT