पुणे ः सौरऊर्जेचा वापर करून कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जा (सोलर) संच दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या या नावीन्यपूर्ण योजनेतून महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ मिळणार अाहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.
उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून, अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित होत आहे. भारनियमनामुळे दिवसा पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने रात्री जागून शेतकऱ्यांना पिकास पाणी द्यावे लागत आहे. जिल्ह्याच्या काही भागात बिबट्याचा वावर असून, इतरही वन्य प्राणी आढळून येत आहेत. तसेच साप, विंचू या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशाच्या घटनाही घडत आहेत. यातच विजेचा वापर वाढल्यास रोहित्र (डीपी) जळण्याचे प्रकारही वाढले आहेत.
रोहित्र जळाल्यास दोन ते तीन महिन्यांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विजेअभावी पाणी न मिळाल्याने पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी सोलर संच देण्याची योजना उपयुक्त ठरणार आहे.
पवार म्हणाल्या, की या योजनेतून शेतकऱ्यांना पाच एचपी क्षमतेचा पंप चालू शकेल, असा सोलर संच देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिसंच सुमारे ४ लाख खर्च अपेक्षित असून, जिल्हा परिषदेमार्फत ५० टक्के रकमेचे अनुदान देणार आहे, तर शेतकऱ्याला स्व-हिस्सा म्हणून २० टक्के रक्कम भरावी लागेल.
उर्वरित ३० टक्के रक्कम पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेकडून कर्जरूपाने उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे लाभार्थी निवडताना सातबारा उतारा आणि वीजजोडणी नावावर असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांचा थेट लाभ देण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. शनिवार, रविवार आणि बॅंकाच्या आर्थिक वर्षांची अखेर असल्याने पैसे जमा करण्यास उशीर होत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती कृषी सभापती सुजाता पवार यांनी दिली.