पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात आत्माअंतर्गत ४० गट स्थापन करण्यात आले असून गटांच्या माध्यमातून दोन हजार शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये वाटचाल सुरू केली आहे. त्याअंतर्गत सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे.त्यामुळे येत्या काळात नागरिकांना सेंद्रिय भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून सरकारने सेंद्रिय शेतीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा, यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे गट स्थापन करण्यापासून ते त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या विक्रीपर्यंत व्यवस्था करण्याचे काम आत्माअंतर्गत केले जात आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे, गट मार्गदर्शकांची निवड, प्रशिक्षण, माती नमुने तपासणी करणे, अभ्यासदौरे, शेतकरी नोंदणी करण्यात आली.
दुसऱ्या वर्षी निविष्ठा पुरविणे, पीजीएस ग्रीन प्रमाणपत्र देणे, गांडूळ खत युनिट उभारणे आदि बाबी देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पहिल्यावर्षी एक कोटी ८१ लाख, तर दुसऱ्यावर्षी दोन कोटी १९ लाख रुपयांचा निधी यासाठी मिळाला.
सध्या जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले आहेत. त्याअंतर्गत सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे. त्यामध्ये भाजीपाल्यात कांदा, फ्लॉवर, कोबी, वांगे, टोमॅटो, भेंडी, कडधान्यात तूर, मूग, भात, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, फळामध्ये डाळिंब, अंजीर, सीताफळ आदी पिके शेतकरी घेऊ लागले असून काही शेतकऱ्यांचे पीक उत्पादन सुरू झाले आहे.
या उत्पादकांच्या सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण तसेच ऑनलाईन नोंदणी झाली असल्यामुळे हा शेतीमाल ग्राहकांना उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच त्यांना इतर शेतीमालाच्या तुलनेत चांगले दर मिळत आहे.