म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का?
म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का? 
मुख्य बातम्या

म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का?

टीम अॅग्रोवन

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत लाभ क्षेत्र असलेल्या मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्‍यांत दुष्काळाची छाया गडद होत आहे. वास्तविक पाहता ही योजना सुरू असली तरी परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच अद्यापही शेतकऱ्यांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्याची मागणी करून देखील पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे म्हैसाळ योजना केवळ नावालाच आहे का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

म्हैसाळ योजनेचे आवर्तन खरीप हंगामात सुरू केले असते, तर भूजल पातळी स्थिर राहिली असती. खरीप वाया गेल्यानंतर सध्या ही योजना सुरू झाली आहे. योजना सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरीही अजून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी दिसत नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी मिरज तालुक्‍यातून कवठेमहांकाळ तालुक्‍यात गेल्या आठवड्यात पोचले आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातून हे पाणी जत तालुक्‍यात सोडण्यात आले आहे.

दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे. द्राक्ष बागांच्या छाटण्या रखडल्या आहेत. ज्या फळ छाटण्या झाल्या आहेत, त्यांना पाणी नाही. त्यामुळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडावे, अशी मागमी दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र अद्यापही या योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आलेले नाही. दुष्काळी पट्ट्यातील भागातील शेतकरी द्राक्ष, डाळिंब पिकाला टॅंकरने पाणी देऊन बागा वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी अजूनही मुख्य कालव्यातून वाहताना दिसते आहे. पोटकालव्यातून पाणी शेतीच्या शिवारात गेलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचेही आर्थिक गणित कोलमडू लागली आहेत. शेतमजुरांचा प्रश्नही गंभीर बनणार आहे.

पैसे संकलन, भरणा नाहीच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकरी पैसे भरत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी पैसे भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे पैसेही देत आहेत. मात्र वसूल झालेली पाणीपट्टी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी भरणाच केला नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तर अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता, हा भाग आमच्या विभागात येत नाही, अशी धक्कादायक उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT