नाशिक बाजार समितीकडून ३० गाळ्यांना कुलूप
नाशिक : पेठरोड येथील शरदचंद्र पवार बाजार समितीतील गाळेधारकांनी भाडेवाढ नाकारली म्हणून त्यांच्या ३० गाळ्यांना समितीने कुलूप ठोकले आहे. रितसर भाडेवाढ करीत असतानाही विरोध होत असल्याने कारवाई केल्याचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी स्पष्ट केले आहे.
पेठरोड येथील मार्केट यार्डात टमाटा आणि डाळिंब व्यापाऱ्यांसाठी १४८ गाळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या गाळ्यांना वर्षाकाठी ८ हजार रुपये भाडे आकारणी करण्यात आली होती. चुंभळे यांनी ही भाडे आकारणी चुकीची असल्याचे सांगत दहा बाय दहाच्या गाळ्याला प्रतिमहिना सहा हजार रुपये भाडेवाढ देण्याचा प्रस्ताव व्यापाऱ्यांसमोर ठेवला होता. यामध्ये अनेकदा बैठका होऊन त्यामधून दहा बाय दहाच्या गाळ्याला प्रतिमहिना २ हजार रुपये जवळपास निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यावरही व्यापारी आणि काही संचालक नाखूष असल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव बारगळला होता.
व्यापाऱ्यांनी आणि काही संचालकांनी चुंभळे यांना प्रतिवर्षी असलेल्या भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तो चुंभळे यांना मान्य नाही. ते म्हणाले, दहा बाय दहाच्या गाळ्याला प्रतिमहिना २ हजार आणि जशी जागा वाढेल त्याप्रमाणे भाडे आकारणी करण्यात येईल. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, बाजार समितीने थेट गाळ्यांना कुलूप लावण्यास सुरवात केली आहे. यामध्ये जवळपास ३० गाळ्यांना कुलूप लावण्यात आले असून, जे व्यापारी भाडेवाढीला नकार देतील, त्यांच्यावर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.``