सटाणा बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याची सक्ती
सटाणा, जि. नाशिक : येथील बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाऱ्यांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (ता. ६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी दिली.
कसमादे परिसरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट करणे बंधनकारक असताना व्यापाऱ्यांकडून मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शेतमाल विक्री केलेल्या मालाच्या मोबदल्यात बहुतांशी शेतकऱ्यांना जमा पावती किंवा एक महिन्याच्या तारखेचा धनादेश दिला जात होता. अनेकवेळा व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश बाउन्स होण्याच्या तक्रारी बाजार समितीकडे येत होत्या. या तक्रारींची नवनियुक्त प्रशासन मंडळाने गंभीर दखल घेत सोमवारपासून शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट करण्याचे आदेश दिले.
व्यापाऱ्यांनी रोखीत व्यवहार करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण दाखवत सोमवारी केवळ १५० वाहनांचा लिलाव न करण्याची आडमुठी भूमिका घेतली होती. मात्र, समिती संचालक मंडळाने रोख पेमेंटचा निर्णय कायम ठेवत संपूर्ण वाहनांचा लिलाव करावाच लागेल, अशी तंबी त्यांना दिल्याने व्यापाऱ्यांनी नमते घेऊन सोमवारी (ता. ६) सकाळच्या सत्रात कांद्याच्या २९० वाहनांचा लिलाव केला, तर सायंकाळी उर्वरित ३१४ वाहनांचा लिलाव केल्याची माहिती सचिव भास्कर तांबे यांनी दिली.
रोख रक्कम न मिळाल्यास बाजार समितीकडे चोवीस तासांच्या आत तक्रार करावी अन्यथा ती ग्राह्य धरली जाणार नसल्याचे समिती प्रशासनाने म्हटले आहे.