नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चाळीस कोटींची भरपाई
नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ४० कोटी ५८ लाखांची मदत पाठवली आहे. ६९ हजार ४६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.
नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांत गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील २६ हजार ८८३ शेतकऱ्यांसाठी २२ कोटी ३४ लाख ३२ हजार रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये साधारणत: ३३ हजार ३५३ हेक्टरवरील पिकांना या पावसाचा फटका बसला होता. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला, तर जळगावात केळी आणि अन्य काही पिकांचे नुकसान झाले.
प्राप्त निधी जिल्हा स्तरावरून डीबीटीअंतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने २०१६ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १८ लाख रुपयांचा निधी पाठविला होता.
जिल्हा | शेतकरी | क्षेत्र (हेक्टर) | अनुदान |
नाशिक | २८८८३ | १३८७६ | २२३४.३२ |
जळगाव | ३२३४५ | १४११४ | ११०५ |
नगर | ९२५८ | ४४८८ | ६०६ |
नंदुरबार | ८४२ | ८०७ | १०१ |
धुळे | १३९ | ६६ | ११ |