परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी विभागांतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरेदी हंगामात मंगळवारपर्यंत (ता. २०) खासगी व्यापारी, सीसीआय तसेच पणन महासंघ यांनी मिळून एकूण १० लाख ५० हजार ८७० क्विंटल कापूस खरेदी केला आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले. सध्या फरदड कपाशीची आवक सुरू झाली असून, फरदडला ३५०० रुपये क्विंटलपासून दर मिळत आहेत.
हमीदराने कापूस खरेदी करण्यासाठी पणन महासंघाची परभणी जिल्ह्यात परभणी आणि ताडकळस तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि हयातनगर येथे पणन महासंघाची केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. त्यापैकी हिंगोली येथील केंद्रावर १० शेतकऱ्यांच्या ११९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खुल्या बाजारातील दर वधारल्यानंतर कापूस उत्पादकांनी पणन महासंघाच्या कापूस खरेदीकडे पाठ फिरवली.
परभणी जिल्ह्यात यंदा खासगी व्यापारी तसेच भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांच्यातर्फे कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयची सेलू, मानवत, जिंतूर, ताडकळस येथे खरेदी केंद्रे आहेत. सीसीआयने हमीदर तसेच खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदी केली. सीसीआयने हमीदराने सेलू येथे १३, ७११, मानवत येथे ४९६५, जिंतूर येथे ४५८ अशी एकूण १९,१३४ क्विंटल कापूस खरेदी केली. खुल्या बाजारातील दरानुसार (४३२० ते ४८०० रुपये क्विंटल) ताडकळस येथील केंद्रावर २ हजार ९७, सेलू येथे १७,३१८, मानवत येथे २९,१६२, जिंतूर येथे ४२२ अशी एकूण ४८ हजार ९९९ क्विंटल कापूस खरेदी केली.
खासगी व्यापाऱ्यांकडून परभणी येथे १ लाख १२ हजार ०९८, ताडकळस येथे ९६८७, सेलू येथे ३ लाख ७ , मानवत येथे २ लाख ७ हजार ९५२, पाथरी येथे ४५,६६२, जिंतूर येथे १ लाख २ हजार ८००, बोरी येथे ९५६४, गंगाखेड येथे ५८,४७३, सोनपेठ येथे ४८,६८५, पूर्णा येथे ९५४ अशी एकूण ९ लाख ३५ हजार ९६३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआय आणि खासगी मिळून एकूण १० लाख ४ हजार ९६ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सीसाआयतर्फे हमीदराने जवळा बाजार येथे १४७० आणि खुल्या बाजारातील दरानुसार ३ हजार ६० क्विंटल अशी एकूण ४ हजार ५३० क्विंटल कापूस खरेदी केली. खासगी व्यापाऱ्यांनी हिंगोली येथे २७,१९९, हयातनगर येथे २६०१, जवळा बाजार येथे २८२९, आखाडा बाळापूर येथे ९४५० अशी एकूण ४२ हजार ७९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. पणन महासंघ, सीसीआय, खासगी मिळून एकूण ४६ हजार ७४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
मंगळवार(ता. २०)पर्यंत परभणी जिल्ह्यात १० लाख ४ हजार ९६ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यात ४६ हजार ७७४ क्विंटल अशी दोन्ही जिल्ह्यांत एकूण १० लाख ५० हजार ८७० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. यंदा खुल्या बाजारात प्रतिक्विंटल ४३२० ते ५४०० रुपयांपर्यंत दर मिळाले. गेल्या महिनाभरापासून फरदड कपाशीची आवक सुरू झाली आहे. फरदड कपाशीस ३५०० ते ३९०० रुपये क्विंटल दर मिळत आहेत.