औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन पारंपरिक कापूस उत्पादक जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. तीन जिल्ह्यांत कपाशी क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली असली, तरी मराठवाड्यातील एकूण कपाशी लागवड क्षेत्रात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या आठ जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १७ लाख ७७ हजार हेक्टर आहे. २०१७ मधील खरिपात मराठवाड्यात १५ लाख ९२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती.
त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४ लाख ७ हजार, जालना जिल्ह्यात २ लाख ७९ हजार, बीड जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार, लातूर जिल्ह्यात ५ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात २३ हजार, नांदेड जिल्ह्यात २ लाख ७० हजार, परभणी जिल्ह्यात १ लाख ९२ हजार तर हिंगोली जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरचा समावेश होता.
येत्या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र १६ लाख २१ हजार हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली आहे. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले मोठे नुकसान यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३ लाख ७७ हजार, जालना २ लाख १ हजार तर बीड जिल्ह्यात ३ लाख ३० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील कपाशीचे क्षेत्र ५ हजार हेक्टरवरच प्रस्तावित करण्यात आले असून उस्मानाबाद जिल्ह्यात ३० हजार, नांदेड जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार, परभणीत २ लाख २० हजार तर हिंगोली जिल्ह्यात १ लाख २० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या १६ लाख २१ हजार हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी ६५ लाख ३९ हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ६७ हजार बीजी १ तर ६४ लाख १६ हजार बीजी २ व ५६ हजार नॉन बीटी कपाशी वाणांच्या बियाण्यांची गरज लागणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १८ लाख ८६ हजार, जालना ८ लाख २८ हजार, बीड १३ लाख २० हजार, लातूर २४ हजार, उस्मानाबाद १ लाख ३ हजार, नांदेड १२ लाख ५३ हजार, परभणी ९ लाख ७ हजार तर हिंगोली जिल्ह्यासाठी २ लाख १८ कपाशी बियाणे पाकिटांची गरज भासणार आहे.