पीकविमा प्रश्नी शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला
पीकविमा प्रश्नी शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला 
मुख्य बातम्या

पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न दिल्यास तीव्र आंदोलन करू : उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन

मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकांकडून मागवून घ्यावीत. शेतकऱ्यांनी मते दिली असतील तर त्यांना न्याय देण्याचे काम केलेच पाहिजे. शेतकऱ्यांचे रखडवलेले पैसे त्यांना १५ दिवसांत परत द्या, अन्यथा आज शांत असलेला मोर्चा १५ दिवसांनंतर बोलायला लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्या आणि बँकांना इशारा दिला. 

मुंबईतील बीकेसी परिसरातील ‘भारती अॅक्सा’ कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने बुधवारी (ता. १७) मोर्चा काढला होता. या वेळी शिवसेना खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. 

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की मोठमोठे लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो. फसवाफसवी खूप झाली. १५ दिवसांत मला शेतकऱ्यांची कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे पैसे अडकवून ठेवले असतील, तर १५ दिवसांत त्यांना परत द्या. हे मी हात जोडून सांगतो. शिवसैनिकांना आक्रमक व्हायला लावू नका. 

मुंबईत शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन करणार काय, असा अनेकांना प्रश्‍न पडला. शेतकऱ्यांसाठी काढलेल्या या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली. सरकारने कर्जमाफीचे पैसे बँकाना दिले तर ते पैसे गेले कुठे? पीकविमा कंपनी, बँकांचे अधिकारी आणि राज्य सरकारने एकत्र येऊन बैठक घ्यावी. जी अडचण असेल त्यांनी बैठकीत मांडावी मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. हजारो कोटी रुपये पीकविमा कंपन्यांनी खाल्ले, पंतप्रधान पीकविमा योजना ही पीकविमा कंपन्यांसाठी आणली नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणली आहे. केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांची जाणीव असेल तर पीक विमा कंपन्यांना का नाही, असा सवाल श्री. ठाकरे यांनी केला.

आजवर लाखों शेतकऱ्यांनी न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या आहेत. आम्ही माणुसकी मानणारी लोकं आहोत. सरकार कोणाचेही असले तरी माणुसकी ही महत्वाची आहे. शेतकऱ्याला जेव्हा चहूबाजूने संकट ग्रासते तेव्हा तो आत्महत्या करतो. दोन घास ज्याच्यामुळे येतात, तो शेतकरी उन्हापावसाचा विचार न करता राबत असतो. ही ऑफिसेस बघून ठेवा, कधी ना कधी यांच्यावर धडकण्याची वेळ येणार आहे, असेही त्यांनी शिवसैनिकांना बजावले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT