Siddhesvar Sugar Mill Chimani agrowon
ताज्या बातम्या

Siddhesvar Sugar Mill Chimani : विरोध झुगारून ‘सिद्धेश्‍वर’ची चिमणी पाडली

Team Agrowon

Siddhesvar Sugar Mill : सोलापूर ः सोलापुरातील विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या बहुचर्चित श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाची चिमणी शेतकरी आणि कामगारांचा विरोध झुगारून गुरुवारी (ता. १५) अखेर पाडण्यात आली.

अत्यंत संवेदनशील बनलेल्या या प्रश्‍नामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून कारखान्यापासून एक किलोमीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू केली होती.

तर सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात केला होता. गेल्या दोन दिवसांपासून ती पाडण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू होती. आज अवघ्या काही अवधीत ती जमीनदोस्त करण्यात आली.

बुधवारी (ता. १४) दिवसभर चिमणी कधी पाडणार, याकडे सर्वांचे लक्ष होते, पण काल केवळ त्यासाठीची सामग्री जमा करण्यात आली. गुरुवारी (ता. १५) मात्र चिमणी पाडकामाचे नियोजन पूर्ण करत, अत्यंत नियोजनबद्धरीत्या काही मिनिटांत ती पाडण्यात आली.

सिद्धेश्‍वर कारखान्याची बेकायदा ठरलेली चिमणी न्यायालयाच्या निकालानंतर काढण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने हाती घेतली. या स्थितीत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी परिसरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.

त्यासाठी कारखाना परिसर निर्मनुष्य करण्यात आला, प्रत्यक्ष पाडकाम करणाऱ्या मजुरांशिवाय अन्य कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला नाही. तसेच कोणालाही फोटो, शूटिंग यासाठी मज्जाव करण्यात आला. साखर कारखान्याला चोहोबाजूंनी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

काय आहे प्रकरण?
सिद्धेश्‍वर कारखान्याने २०१४ मध्ये उभारलेली सहवीज प्रकल्पाची ही चिमणी कारखान्याच्या शेजारीच असलेल्या विमानतळाला प्रमुख अडचण ठरते आहे. त्यामुळे विमान प्राधिकरणाने येथून विमानाच्या उड्डाणांना परवानगी नाकारली आहे. शिवाय ही चिमणी उभी करतानाही आवश्यक ते परवाने साखर कारखान्याने घेतलेले नाहीत, अशा तांत्रिक बाबींमुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.

त्यातच सोलापुरातील व्यापारी मंडळींनी एकत्रित येऊन या चिमणीसंबंधात महापालिका ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. कोर्टाचे वारंवार आदेश, सरकारचा अधेमध्ये हस्तक्षेप असे होत गेली आठ वर्षे हे काम रखडले आहे. पूर्वीही एक-दोन वेळा महापालिका प्रशासनाने पाडकामाची जय्यत तयारी केली.

पण प्रत्येक वेळी कारखान्याने त्यावर स्थगिती मिळवली. पण दीड महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त शीतल तेली यांच्याकडे या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. तेव्हा कारखान्याला ४५ दिवसांमध्ये स्वतःहून ही चिमणी पाडण्याचे आदेश दिले.

पण या मुदतीनंतरही कारखान्याने चिमणी पाडली नाही, त्यामुळे आता महापालिकेने स्वतःच ती पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


बासलेगावातील शेतकऱ्याने पेटवला ऊस
मी कारखान्याचा २५ वर्षांपासूनचा सभासद आहे. कारखान्याची चिमणी पाडण्यात येत आहे, पण या कारखान्यावरच आमची उपजीविका आहे.

माझ्या ऊसशेतीवरच माझ्या कुटुंबाची गुजराण चालते, पण आता कारखान्याची चिमणी पाडण्यात येणार असल्याने ऊस ठेवून तर काय करू, त्यामुळे माझ्याकडील ऊस मी पेटवला आहे, अशी प्रतिक्रिया बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथील ऊस उत्पादक चनबसप्पा कल्लाप्पा जगदाळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT