Team Agrowon
अतिवृष्टी
सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय. बऱ्याच ठिकाणी कापाशीची रोपे सुकून रोपांची मर झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
मर रोगाचे दोन प्रकार
कापसातील मर ही दोन प्रकारची असते एक बुरशीजन्य मर आणि दुसरी म्हणजे आकस्मिक मर. जेंव्हा जास्त पाऊस पडतो त्यावेळी शेतात पाणी साठून राहतं आणि बुरशी तयार होते अशा वेळी बुरशीजन्य मर रोगाची लक्षणे दिसून येतात. तर दुसऱ्या प्रकारात पावसाच्या मोठ्या खंडानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीची झाडे अचानक जागेवर सुकू लागतात.
कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये जास्त दिवस पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेलं असतं. अशावेळी पिकाला पाणी दिल्यास किंवा मोठा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकतं आणि कालांतराने झाडाची पाने गळतात.
सध्या बऱ्याच ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. अशा ठिकाणी शेतात पाणी साठून राहिल्यामुळे कपाशीमध्ये फ्युजॅरियम बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. या बुरशीमुळे झाड सुकते आणि पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात.
या बुरशीचा प्रादुर्भाव एका झाडापासून दुसऱ्या झाडाला होतो. त्यामुळे कपाशीच्या शेतात ठिकठिकाणी मर झालेल्या झाडांचा पट्टा तयार होतो. शेतात झाले सुकलेली दिसताच शेतात साठलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा.
प्रादुर्भाव जर कमी प्रमाणात असेल तर २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रत्येक झाडाला १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी. प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या शेजारच्या झाडालाही आळवणी करावी.
प्रादुर्भाव जर जास्त असेल तर प्रत्येक झाडाला आळवणी करण शक्य होत नाही. अशावेळी २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाचे नोझल काढून प्रत्येक झाडाच्या मुळाशी टाकावे. लक्षात ठेवा या द्रावणाची फवारणी करायची नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.