Team Agrowon
मार्च ते एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे (heatwave) केंद्र सरकारचे गहू उत्पादनाचे अंदाज फोल ठरले. देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील शेतकऱ्यांना या उष्णतेच्या लाटेचा फटका बसला.
२०२२ हे वर्ष पिकांसाठी धोकादायक ठरले असून उष्णतेच्या लाटेमुळे आपल्या गहू पिकाचे ३५ टक्के नुकसान झाल्याचे उत्तर प्रदेशातील अली या शेतकऱ्याने म्हटले आहे. वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले. अली यांच्या गव्हाच्या पिकाला उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसला.
२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताच्या गहू उत्पादनात ३ टक्क्यांची घट होवून ते १०६.८४ दशलक्ष टनांवर आले. उष्णतेच्या लाटेमुळे पंजाब आणि हरियाणातील गहू मोठ्या प्रमाणात आकसला. उत्पादन घटल्यामुळे भारत गहू आयात करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र केंद्र सरकारने ही शक्यता फेटाळली.
यावर्षी भारताने मागच्या १२२ वर्षांतील सर्वाधिक तप्त मार्च अनुभवला. मार्च महिन्यात देशातील बहुतांशी राज्याने उष्णतेची लाट अनुभवली. एप्रिल महिन्यात भारतातील तापमानाने ३५.०५ सेल्सियस अंशाची सरासरी गाठली होती.
नोव्हेंबर महिन्यात इजिप्तमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील परिषदेत (COP27) भारताने हवामान बदलाचा खाद्य सुरक्षेवर होणाऱ्या परिणामावर भर द्यावा, असा आग्रह कृषी क्षेत्रातील जाणकारांनी धरला आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर खाद्य सुरक्षा आणि पोषण या विषयाला वाचा फोडण्यासाठी COP27 हे योग्य व्यासपीठ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
COP27 या आंतराराष्ट्रीय व्यासपीठावर ग्रीन एनर्जी आणि खाद्य सुरक्षा यात संतुलन राखण्याची गरज इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्सच्या (ICRIER) वरिष्ठ सलागार श्वेता सैनी यांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.