संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

संभ्रम व्हावा दूर

विजय सुकळकर

मा गील जवळपास दोन दशकांपासून सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचा प्रचार करीत आहेत. या त्यांच्या शेती पद्धती पॅटर्नचे ४० लाख अनुयायी असल्याचे सांगितले जाते. आपल्या शिबिरांमध्ये अतिरंजीत दावे करून अनुयायी वाढविण्याचे काम पाळेकर मागील अनेक वर्षांपासून करतात. परंतु, त्यांच्याच पॅटर्ननुसार तीन-चार वर्षे शेती करून आत आलेले शेतकरी हे सर्व कसे थोतांड आहे, हे सांगणाऱ्यांची संख्याही कमी नाही. गमतीशीर बाब म्हणजे पाळेकरदेखील सुरवातीपासून कोणत्याही एका तंत्रावर ठाम नाहीत. सुरवातीला त्यांना सेंद्रिय शेती आशेचा किरण वाटत होती. त्यानंतर पाळेकर यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ आणली. झिरो बजेटवर टीकेची झोड उठत असताना आता त्यांनी आपल्या शेती पॅटर्नचे नाव ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ असे ठेवले आहे. परिस्थिती तसेच काळानुरूप तंत्रज्ञानात बदल हे होतच असतात. परंतु, पाळेकर सोयीनुसार केवळ नावात बदल करीत असून त्यांच्या तंत्रज्ञानात मात्र फारसा बदल दिसून येत नाही. मुळात सद्यःपरिस्थितीमध्ये झिरो बजेटमध्ये अर्थात एकही पैसा खर्च न करता शेती करता येऊ शकते, हा विचारच सर्वसामान्य शेतकऱ्यालासुद्धा पटण्यासारखा नाही. तसेच, बाहेरून कोणतीही निविष्ठा न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने किफायतशीर शेतीच्या पाळेकर यांच्या दाव्याबाबत देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अशावेळी पाळेकर पॅटर्नचा शास्त्रशुद्ध अभ्यास यापूर्वीच कृषी विद्यापीठे तसेच संशोधन संस्थेत होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. सोशल मीडियावर मात्र पाळेकर समर्थक आणि विरोधक वरचेवर भिडत असतात. परंतु, त्यातूनही शेतकऱ्यांमधील संभ्रम वाढतच जात आहे. अशावेळी उशिरा का होईना भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) पाळेकर पॅटर्नचा अभ्यास करण्याचे ठरविले ते बरेच झाले.

नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती आणि एकात्मिक शेती या काळानुरूप शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या पद्धती आहेत. रासायनिक निविष्ठांच्या निर्मितीपूर्वी देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक अथवा सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नव्हता. या शेती पद्धतीने आपल्या देशातील त्यावेळच्या कमी लोकसंख्येची भूकदेखील भागत नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी संकरित जाती, रासायनिक शेती पद्धतीचा स्वीकार आपण केला. या पद्धतीने आपल्याला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनविले. पुढे रासायनिक शेतीमध्ये रसायनांचा अतिरेक झाला. त्याचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर देशात एकात्मिक शेती पद्धतीवर काम झाले. आता या देशातील संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे प्रामुख्याने एकात्मिक शेतीची शिफारस करून त्यामध्ये रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. या सर्व प्रक्रियेमध्ये पाळेकर मात्र स्वतःचे वेगळे असे तंत्रज्ञान सिद्ध करण्याऐवजी कृषी विद्यापीठे असो अथवा सरकारी यंत्रणा यावर टीकाटिप्पणी करीत असतात. खरे तर या देशात नैसर्गिक तसेच सेंद्रिय शेतीसुद्धा कोण, किती प्रामाणिकपणे करतात, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. आता आयसीएआरने पाळेकर पॅटर्नचा अभ्यास करण्याचे ठरविलेच आहे तर त्यांनी केवळ या एका पॅटर्नचा अभ्यास न करता नैसर्गिक शेती, पाळेकर पॅटर्ननुसार नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती तसेच रासायनिक आणि एकात्मिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा. त्याकरिता या सर्व शेती पद्धतीचे ट्रायल अथवा डेमो प्लॉट घ्यायला हवेत. असा तुलनात्मक अभ्यास निःपक्षपातीपणे करून सर्व शेती पद्धतींची वस्तुनिष्ठ माहिती सर्वांसमोर यायला हवी. कोणत्या परिस्थितीत कोणती शेती पद्धती स्वीकारावयाची, त्यांच्या स्टॅंडर्ड शिफारशी काय आहेत, हे सुद्धा शेतकऱ्यांना सांगायला हवे. अशा तुलनात्मक अभ्यासातून नैसर्गिक, सेंद्रिय, एकात्मिक अशा विविध शेती पद्धतींबाबत शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT