नगर ः केंद्र सरकार पुरस्कृत अटल सौरपंप योजनेसाठी जिल्ह्यात ३०० सौरपंप वाटपाचे उद्दिष्ट महावितरणला देण्यात आले होते. त्यांपैकी १८७ सौरपंपांचे अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी दिली.
या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी अभय महाजन, सचिवपदी अनिल बोरसे तर सदस्य म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण अधिकारी, महाऊर्जाचे अधिकारी आहेत. ही समिती १८७ प्रस्ताव मंजूर करणार आहे.
सौरऊर्जा कृषिपंप योजनेसाठी नगर जिल्ह्यातून २२० अर्ज प्राप्त झाले होते. यात नगर तालुक्यातून एकही अर्ज आला नव्हता. कोपरगाव तालुक्यातून केवळ एक अर्ज प्राप्त झाला होता. प्राप्त अर्जांपैकी १८७ अर्ज योजनेतील अटी व शर्तींत बसत असल्याने पात्र झाले.
पात्र अर्जांपैकी १२८ अर्ज विहिरींवरील पंपांसाठी तर ५९ अर्ज कूपनलिकांवरील पंपांसाठी आले आहेत. ३३ अर्ज अपात्र ठरले. पात्र अर्ज मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती बोरसे यांनी दिली.
पात्र अर्जांची तालुकानिहाय संख्या : पारनेर - ६८, पाथर्डी - १९, शेवगाव - १०, जामखेड - ४, कर्जत - ७, श्रीगोंदे - ५, अकोले - ३०, कोपरगाव - १, संगमनेर - १९, नेवासे - ८, राहाता - २, राहुरी - ६, श्रीरामपूर - ८.