पुणे ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना कमी दर मिळून मोठे नुकसान होते. हे होऊ नये म्हणून शासनाने कांदा चाळी उभारणीवर गेल्या काही वर्षांपासून भर दिला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११ हजार २९९ कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास दोन लाख दोन हजार ८५० मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता तयार झाली आहे. योग्य दर असताना या शेतकऱ्यांना कांदा विक्री करणे शक्य होणार आहे.
यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ८५ हजार ६०१ शेतकऱ्यांनी ५० हजार ५७३ हेक्टरवर कांदा लागवड केली आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदाही कृषी विभागाने सुमारे साडेचारशे ते पाचशे कांदा चाळीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ११ हजार २९९ कांदा चाळी उभ्या राहिल्या आहेत.
त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून ३५७९ कांदा चाळी उभारण्यात आल्या असून त्यांची साठवणूक क्षमता ७१ हजार ७०७ मेट्रिक टन एवढी आहे. खासगी माध्यमातून ७७२१ कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्याची साठवणूक क्षमता ही एक लाख ३१ हजार ३७८ मेट्रिक टन एवढी आहे.
आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवड झाली आहे. तालुक्यात सुमारे ९५७० शेतकऱ्यांनी ५५४५ हेक्टरवर कांद्याची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन आंबेगाव तालुक्यात होणार आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी आत्तापर्यंत तालुक्यात सुमारे ३९०५ कांदा चाळी उभारण्यात आल्या असून त्याची क्षमता ६० हजार ४११ टन एवढी आहे.