कुंडल, जि. सांगली : देशाची अर्थव्यवस्था काळजी करण्यासारखी आहे. ती सुधारण्यासाठी सरकारने शेतीबाबतची धोरणे बदलली पाहिजेत. शेतकऱ्याच्या घामाला चांगली किंमत देण्यासाठी शेतीमालाला भाव देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २) कुंडल येथे केले.
क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या अभीष्टचिंतन कार्यकर्तृत्व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी शरद पवार यांच्या हस्ते ‘ध्यास पर्व क्रांती विचारांचे वृत’ आणि ‘महाराष्ट्रचे शिल्पकार जी. डी. बापू लाड’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले.
या वेळी आमदार जयंतराव पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार शशिकांत शिंदे, सरपंच प्रमिला पुजारी सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, प्रमिला लाड, धनश्री लाड यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की दहा वर्षे शासनाच्या साखर धोरण ठरवण्याचे काम केले आहे. यामध्ये राज्यातील साखर कारखान्याकडे लक्ष होते. यात ऊस नियोजन, उत्पादन, व्यवस्थापन क्राती कारखाना अग्रेसर ठरला आहे. आज शेतीची काळजी करण्याची आहे. जोपर्यंत राजकर्ते मोकळ्या हाताने देत नाहीत तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडणार नाही.
नोटाबंदीमुळे मंदीचे सावट संबध महाराष्ट्र भर निर्माण झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खाद्य तेलाची आपल्याकडे कमतरता आहे. आपण खाद्य तेल हे ब्राझील, अमेरिका, चीन अशा ठिकाणांहून आयात करतो आणि आम्ही सांगतो की आमचा देश कृषी प्रधान देश आहे. म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची गरज आहे.
कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड म्हणाले, की कारखान्याची गुणवत्ता वाढवली आहे. कारखान्याने सरासरी उत्पादकता वाढवली पाहिजे. या वेळी जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आण्णासाहेब डांगे यांची भाषणे झाली. स्वागत शरद लाड यांनी केले.