cane crushing
cane crushing  
मुख्य बातम्या

महाराष्ट्र, कर्नाटकाची ऊस गाळपात पिछाडी 

Raj Chougule

कोल्हापूर: देशात उत्तरप्रदेश खालोखाल साखर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटकात यंदा दुष्काळ, पूर आणि अतिवृष्टीमुळे साखर हंगाम अत्यंत धिम्या गतीने सुरू झाला. गेल्या हंगामाच्या तुलनेत दहा टक्केही साखरेचे उत्पादन या राज्यांत झालेले नाही. हंगामाच्या प्रारंभीच ही पीछेहाट झाल्याने डिसेंबरनंतर गती वाढली तरी साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्रात अधिकृत हंगाम सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी झाला असला तरी कुठेही वेग घेतलेला नाही. साखर उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रात अजूनही शांतताच आहे. यामुळे गतीने हंगाम सुरू होण्यास डिसेंबर उजाडेल असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. यंदाच्या, हंगामात उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात उसासाठी बिकट स्थिती आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात महापूर तर उर्वरित महाराष्ट्रात दुष्काळाने उसाचे नुकसान झाले. गेल्या वर्षीचा विचार केल्यास १५ नोव्हेंबर अखेर राज्यात १९ साखर कारखाने सुरू झाले होते. या कालावधी अखेर ६ लाख ३१ हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. 

यंदा २२ तारखेला हंगाम सुरू झाला. पण अगदी बोटावर मोजण्याइतके कारखाने सुरू झाले. ‌‌‌‌‌‌‌‌‌अद्याप हा आकडा दोन लाख साखर पोत्याच्यावर गेलेला नाही. राज्यात सर्वोच्च उत्पादन देणाऱ्या दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रात तर अपवाद वगळता कुठेच अजून गतीने तोडणी सुरू झाली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा पुणे, नगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्‍यांनी ऊस क्षेत्र घटले आहे. हे जिल्हे साखर उत्पादनात अग्रेसर मानले जातात. याच जिल्ह्यात तब्बल चाळीस टक्‍यापर्यंत साखर उत्पादन घटीचा अंदाज व्यक्त होतोय. 

कर्नाटकात गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर अखेर ५३ साखर कारखान्यांनी ३ लाख ६० हजार टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदा केवळ १८ कारखाने सुरू असून त्यातून १ लाख ४३ हजार मेट्रिक टन साखर उत्पादित झाली आहे. यंदा उत्तर कर्नाटकातील विजापूर, बेळगाव जिल्ह्यात पुराने थैमान घातले याचा मोठा फटका गळीत हंगामाला बसत आहे. दोन्ही राज्याच्या सीमेवरील कारखान्यांना या स्थितीचा फटका बसणार असल्याने दोन्ही राज्यातून साखरेची मोठी घट अपेक्षित असल्याचा अंदाज ऊस तज्ज्ञांचा आहे.  देशात ६५ टक्‍यांनी साखर उत्पादन घटले  महाराष्ट्रात आणि कर्नाटक या दोन राज्यांत असणाऱ्या परिस्थितीचा परिणाम देशातील साखर उत्पादनावरही झाला आहे. या दोन्ही राज्यात साखर उत्पादन मंद गतीने सुरू असल्याने देशातील साखर उत्पादनातही पहिल्या टप्प्यात घट दिसते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात १५ नोव्हेंबर अखेर देशातील साखर उत्पादन तब्बल ६५ टक्‍यांनी घटले आहे. यावरून यंदाच्या हंगामाचा अंदाज येऊ शकतो. डिसेंबर नंतर थोडी गती वाढणार असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात मोठी घट होईल अशी शक्‍यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT