नाशिकमध्ये पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान
नाशिकमध्ये पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्हाभर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाचे पीक कापणीसाठी आलेले असताना पाऊस सुरू असल्याने पिके खळ्यावर आणता न आल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या द्राक्ष बागांवर मोठे संकट कोसळले आहे. 

चालू वर्षी गंभीर दुष्काळाचा सामना केल्यांनातर पावसाची प्रतीक्षा असताना पाऊस उशिरा आला. अखेर पाऊस आल्यानंतर पिके बहरली. मात्र आता पिके कापणीसाठी आली असताना पावसामुळे कापणीला व्यत्यय येत आहे. ज्या पिकांची कापणी झाली आहे, अशी पिके शेतात असताना पाणी साचल्याने शेतातच पडून आहेत. सिन्नर, इगतपुरी, निफाड, येवला, देवळा, बागलाण, कळवण व नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका, सोयाबीन व बाजरीचे नुकसान झाले आहे. बाजरी, मक्याच्या कणसांत व सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब फुटले आहेत. त्यामुळे मक्यावरील लष्करी अळी व सोयाबीनवरील हिरव्या अळीचा प्रादुर्भाव टाळून आलेले पीक मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात बाधित झाले आहे. खरीप कांदा लागवडी खराब होण्यासह नवीन उन्हाळ कांद्याची रोपे खराब होत आहेत. इगतपुरी तालुक्यात प्रामुख्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे. 

कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष बागांवर मोठे संकट कोसळले असताना नियमित हंगामालासुद्धा मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निफाडसह परिसरातील उगांव, शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी नैताळे रामपूर कोळवाडी शिवरे भागात सोमवार (ता. २८) विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पावसाचा जोर राहिल्याने द्राक्ष बागांना मोठा बसला आहे. सद्यःस्थितीत द्राक्ष  बागांच्या छाटणीनंतर द्राक्ष बागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहेत. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्ष बागेच्या पानांवर व घडांवर करपा, डावणी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच, फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ अन् घडकूज या पावसाने मोठ्या प्रमाणावर होत आहे. द्राक्ष बागेत सर्वत्र चिखल असल्याने फवारण्या करताना अडचणी येत आहेत, तर रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च वाढला आहे. 

संथ गतीने पंचनामे सुरू 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. दिवाळी व शासकीय सुट्यांच्या धावपळीत पंचनामे प्रलंबित आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे. 

लोकप्रतिनिधींकडून पाहणी 

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाल्याने दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, निफाडचे आमदार दिलीप बनकर, देवळालीच्या आमदार सरोज आहिरे, बागलाणचे आमदार दिलीप बनकर, नांदगावचे आमदार सुहास कांदे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी   केली आहे. 

पीकनिहाय प्राथमिक नुकसान 

पीक पेरणी क्षेत्र (हेक्टर)   नुकसानीची टक्केवारी 
भात  ७८७४१  २० टक्के
बाजरी १०१९१  १० टक्के
मका २१९०३१  ३० टक्के
भुईमूग  २५०८६ २० टक्के
सोयाबीन  ६९४२३  ३५ टक्के
कापूस   ३६२८८   २० टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT