राज्यांच्या शिफारशींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने विचार करावा
राज्यांच्या शिफारशींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने विचार करावा 
मुख्य बातम्या

राज्यांच्या शिफारशींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने विचार करावा

टीम अॅग्रोवन

मुंबई: राज्य शासनाने शेतमालाच्या दरासंदर्भात केलेल्या शिफारशींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे केले. खरीप २०१८ साठीच्या शेतमालाच्या किमतीबाबत पश्चिम विभागीय राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक येथील सह्याद्री अतिथिगृहात मंगळवारी (ता. ९) झाली. त्या वेळी श्री. फुंडकर बोलत होते. बैठकीस राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गुजरातचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव व्यास, राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्यासह राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश येथील कृषी विद्यापीठाचे संशोधक, अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री श्री. फुंडकर म्हणाले, की शेतकरी शेतमालाचे उत्पादन घेतो मात्र त्याला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. या परिस्थितीत आता काळानुरूप बदल झाला पाहिजे. शेतमालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करताना संबंधित राज्यांची दिल्लीत बैठक घ्यावी. त्यांच्या शिफारशी विचारात घेऊन शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मालाला न्याय द्यावा. शेतीसाठी लागणारा खर्च, त्यातून होणारे उत्पादन आणि आयात धोरण यांचा ताळमेळ ठेवला जावा, अशी अपेक्षा कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रत्येक राज्यात भौगोलिक परिस्थितीनुसार पिकांसाठी होणाऱ्या खर्चामध्ये तफावत असू शकते. त्यामुळे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने शेतमालाचे भाव निश्चित करताना याची नोंद घेणे गरजेचे आहे. सहकारमंत्री श्री. देशमुख या वेळी म्हणाले, की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढविले पाहिजे. कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय यांनी एक एक गाव दत्तक घेऊन शेतीचे प्रयोग करावेत, यामुळे कृषी क्षेत्राचे चित्र नक्की पालटण्यास मदत होईल. राज्य शासनाने केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे केलेल्या शिफारशींपेक्षा १० टक्के वाढीव किंमत देण्यात यावी, अशी मागणी सहकारमत्र्यांनी या वेळी केली. राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, की शेतीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्याचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा अंदाज घेऊन आयात निर्यात धोरण ठरविल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. केंद्रीय अध्यक्ष श्री. शर्मा या वेळी म्हणाले, की शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे. तो प्रत्येक्षात येण्यासाठी शेती विकासात तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याबरोबरच शेतीमधील खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नही वाढले पाहिजे, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. राज्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल या वेळी म्हणाले, की शेती मालाचा भाव निश्चित करताना भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक राज्याचे याबाबत ज्या शिफारशी आहेत, त्यांची दखल केंद्रीय आयोगाने घेतली पाहिजे. कडधान्य, तेलबिया उत्पादनामध्ये शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या पिकाला जास्त भाव मिळतो, ते पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो. त्याचा शेतमालाच्या भावावर कालांतराने परिणाम होतो, असेही त्यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांनी सादरीकरण केले. बैठकीस केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या सदस्य सचिव शैलजा शर्मा, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह चारही राज्यांतील कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ अधिकारी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT