Team Agrowon
महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्ण लाटा येणार आहेत. उन्हाळ्यात एल-निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी शुक्रवारी (ता. १) जाहीर केला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात देशाचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.
१९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना दुसऱ्या क्रमांकावर आहे.
फेब्रुवारीत देशात सरासरी १४.६१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २०१६ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १४.९१ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती.
मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे.
विदर्भात कमाल तापमान सरासरी इतके राहणार असल्याने या महिन्यातच उन्हाच्या झळा वाढणार आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे.