Team Agrowon
कोणे एकेकाळी म्हणजे जेमतेम हरितक्रांतीच्या आधी कडधान्य आणि भरडधान्य समृद्ध असलेली भारतीय शेती आज डाळी बाहेरच्या देशांमधून आपण आयात करीत आहोत तर भरडधान्य डोंगराळ आदिवासीबहूल भागांपुरती मर्यादित करून ठेवली आहेत.
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात मुख्य धान्याबरोबर कडधान्य, भरडधान्य हे पूरक अन्न म्हणून असे. त्यातील भरडधान्य हळूहळू कमी होत गेले.
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात रब्बीचा हरभरा कायम फुललेला असे. कापूस, सोयाबीन आणि उसासारख्या पिकांनी विविध पारंपरिक पिकांनी समृद्ध असलेल्या भारतीय शेतीवर मागील तीन-चार दशकांत पूर्ण कब्जा मिळवला.
पारंपरिक कडधान्य सेंद्रिय पद्धतीने भरपूर उत्पादन देत होती. पण शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणाऱ्या रासायनिक खतांनी जाळ्यात पकडले आणि १५-२० पिकांची श्रीमंत खरीप आणि रब्बी शेती जेमतेम २-३ पिकावर येऊन थांबली आणि याचा परिणाम धान्य निर्यातीपेक्षा आयातीवर जास्त झाला. त्यास कारण होते अन्न सुरक्षा!
भारताने मागील आर्थिक वर्षात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच ४५ लाख टन कडधान्याची आयात केली आहे आणि त्यासाठी आपण तब्बल ३१ हजार कोटी रुपये मोजले आहेत.
ही रक्कम निश्चितच कमी नाही. कडधान्याचे उत्पादन नियमितपणे घेणारे अनेक शेतकरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक तसेच बिहारमध्ये आहेत. पूर्वी कडधान्यासाठी महाराष्ट्र राज्य आघाडीवर होते. मात्र आता बरेच पिछाडीवर गेले आहे.
डाळवर्गीय पिके भारतीय शेतीचा मुख्य गाभा आहेत. केंद्र सरकारतर्फे कडधान्यांना प्रोत्साहन असून सुद्धा आपली कडधान्यांची आयात कमी होईल एवढे उत्पादन आपला शेतकरी घेत नाही.
कडधान्यांना देशांतर्गत प्रोत्साहन देऊन त्यांचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी शासन आणि शेतकरी या दोघांनी मूळ उत्पादनाबरोबर त्याच्या उपपदार्थास तेवढेच महत्त्व देणे गरजेचे आहे.
World Agri-Tourism Day : कृषी पर्यटनातून पूरक व्यवसायाची संधी