Radhika Mhetre
नदीतून गाळ येणे आणि तो प्रवाही होणे हे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. नदीच्या स्वभावाला ते अनुरूपही आहे. गाळाने सुपीक भूभाग तयार व्हायचा आणि तो पोषणाचा आणि उपजीविकेचे साधन ठरत असे.
मातीची धूप आपल्या देशात सर्वदूर आहे आणि ती प्रत्येक नदी खोरे आणि उपखोरे यांच्यात आहे, त्याची तीव्रता भिन्न आहे.
सबब त्याचा अभ्यास आणि व्यवस्थापन विकेंद्रित पद्धतीने होणे गरजेचे ठरते. मातीची होणारी धूप हा आजही विचार करायला लागणारा विषय आहे. येत्या दशकामध्ये तर याचे गंभीर परिणाम दिसणार असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
मागील सुमारे २०० ते ३०० वर्षांपासून जसजसा तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि मानवी वस्ती स्थिरावली, तेव्हापासून याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. मानवी वसाहती या नदीच्या तीरावरच वसल्या आहे.
शेतातून डोंगर उतारावरून वाहून आलेला गाळ हा थेट नदीपात्रामध्येच साचतो किंवा त्या ओढ्याच्या अथवा छोट्या नद्यांच्या प्रवाहावर बांधण्यात आलेल्या तलावांवर धरणांच्यामध्ये तो साठतो. यामुळे नद्यांची वहन क्षमता जवळपास निम्म्याने कमी झालेली आहे.
गाळ मोठ्या प्रमाणावर वाहून येत असल्यामुळे नद्यांचे पात्र उथळ झाल्याचे आढळते. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. केवळ पश्चिम घाट नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या प्रभावाखाली आहे. किंबहुना, देशाचा हा गंभीर प्रश्न बनला आहे.