Radhika Mhetre
देशात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे कडधान्याचे उत्पादन घटले आहे. यामुळे देशातील कडधान्य आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक झाली.
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत देशात जवळपास १५ लाख टनांची आयात झाली.त्यासाठी भारताला १२६ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले.
केंद्र सरकारकडून कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कडधान्यांसाठी देशाचे आयातीवरील अवलंबित्व वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक प्रयत्न करूनही भारताला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता गाठता आली नाही. यंदा ‘एल निनो’चा फटका बसल्यामुळे कडधान्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत कडधान्यांच्या पुरवठ्यात मोठा तुटवडा पडला.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये सुमारे १५ लाख टन कडधान्यांची आयात झाली. मागील हंगामात याच काळात आयात जवळपास ७ लाख टन होती.
यंदा भारताने मसूर, तूर आणि उडीद आयात वाढविल्याने एकूण कडधान्य आयात वाढलेली दिसते. विशेषतः मसूरची आयात जवळपास तिप्पट वाढली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत मसूरची आयात ८ लाख टन झाली.
मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत आयात २ लाख ८१ हजार टन होती. महत्त्वाचे म्हणजे मागील संपूर्ण आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये ८ लाख ५८ हजार टन मसुराची आयात झाली होती.