Team Agrowon
बियाणे खरेदीच्या तोंडावर आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी (५०० किलो) ३८ ते ४१ हजार रुपये दर मिळू लागला आहे.
यामुळे नवीन लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे दर वाढणार असल्याने लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. बियाण्याचे दर व पाणी स्थितीवर आले लागवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यात आले पीक घेणारा सातारा प्रमुख जिल्हा असून सरासरी तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावर आले पिकाची लागवड होते.
आगामी आले लागवडीच्या दृष्टीने निरोगी व दर्जेदार बियाण्यांचा शोध सुरू झाला आहे. आले पीक टिकण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी निरोगी बियाणे आवश्यक असते. मार्चच्या अखेरीपर्यंत बियाणे खरेद सुरू राहणार आहे.
त्यादृष्टीने सध्या शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बियाण्याच्या खरेदीच्या तोंडावर आल्याच्या दरात सुधारणा होत आहे.
सध्या धुणीच्या आल्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ३८ ते ४१ हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. हा दर मागच्या पंधरवड्यात ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडी मिळाला होता.