Team Agrowon
समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह तयार करावा. शेतीतील त्यांना भेडसावणारे प्रश्न यावर विचारमंथन करावे. एकत्रितपणे काय करता येण्यासारखे आहे याची यादी बनवावी.
सर्वसाधारण शेतकरी कुठले ना कुठले एक प्रमुख पीक घेत असतात. त्यात पिकाला अनुसरून समूह शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी या अनौपचारिक बैठकीत एकत्रित कृती आराखडा तयार करावा
बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांना याविषयी माहिती देत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग मिळवावा.
समूह तयार झाल्यास गटामार्फत सर्व कामे करण्यासाठी उद्दीष्ट ठरवावे. त्यानुसार कृती कार्यक्रम आखावा.
पुढील वाटचालीसाठी गटातील प्रत्येक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या जमीन, पाणी, अवजारे, जनावरे अशा संसाधनांचा एकत्रितपणे सर्व गटांसाठी वापर करण्याची मानसिकता तयार करावी.
गटसमूहाने व्यापारी, सेवावितरक, निविष्ठा पुरवठादार, शेतमाल खरेदीदार, बॅंक यांच्याशी समन्वय ठेवावा. उदा. गटांसाठी कर्ज मिळविणे हे वैयक्तिकरित्या कर्ज घेण्यापेक्षा सोपे होते. कर्ज घेतल्यास त्याचा वापर व्यवस्थितपणे होण्यासाठी सर्वांनी दक्ष असावे.
गटसमूहाची योग्य वाटचाल होण्यासाठी नियमितपणे बैठका, विचार विनिमय व एकत्रित निर्णयाची आवश्यकता असते. प्रत्येक उद्देश, केलेला विचारविनिमय व त्यातून घेतलेले निर्णय यांचे इतिवृत्त लिहून नोंद ठेवावी. पुढील वाटचालीमध्ये मागील निर्णयाच्या नोंदी उपयुक्त ठरतात.
गटसमूह स्थापन होऊन एकत्र शेती करण्याचा निर्णय पक्का झाल्यास गट नोंदणीविषयी माहिती काढून त्या दिशेने प्रयत्न करावेत. हा बिंदू म्हणजे गटशेतीचा उगम होय.