Mahesh Gaikwad
संपूर्ण देशभरात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तर प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त आहे.
पहिल्या टप्प्यात १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मतदान होत आहे.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील एक हजार ६२५ उमेदवार लोकसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये १३४ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यासाठी १६.६३ कोटी मतदारांच्या हातात या उमेदवारांचे भवितव्य असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्येही मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदार मतदान करताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.