Team Agrowon
पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर राहतो. त्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात.
बदलत्या वातावरणात जनावरांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. हे लक्षात घेऊन पावसाळ्यात जनावरांचे योग्य संगोपन, गोठा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन तसेच विविध आजारांपासून प्रतिबंध करता येईल.
गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो, अमोनियाचे प्रमाण वाढल्याने जनावरांच्या डोळ्यांवर परिणाम होतो, अस्वच्छ गोठा, पाण्याच्या गळतीमुळे कोक्सीडिओसिस होऊ शकतो. शेळ्यांमध्ये खूर कुजण्याचा आजार होतो. याकडे दुर्लक्ष करू नये.
गव्हाणी, पाण्याचा हौद आणि गोठ्यात चुना फवारणी आवश्यक आहे. दूध काढण्याची जागा स्वच्छ खेळती असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा किंवा शेण असू नये.
गोठ्याच्या भिंतीला जमिनीपासून पाच फुटांपर्यंत चुना लावावा, त्यामुळे गोठा जंतुविरहित राहतो. गोमूत्र, पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना करावी. गोठ्याबाहेर शोषखड्डा तयार करावा. त्यात मलमूत्र सहज जमा होईल अशी व्यवस्था करावी.
जनावरांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक खाद्य देणे आवश्यक आहे, जनावरांच्या खाद्यात हिरव्या चाऱ्याचे योग्य प्रमाण ठेवावे, यामुळे अतिसार, पोटदुखी होणार नाही.
खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी खनिज विटा गोठ्यात टांगत्या ठेवल्यास गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आवडीने चाटतात. त्यामुळे खनिजांची कमतरता होणार नाही, जनावरांची प्रकृती योग्य राहण्यास मदत होते.