sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यात सलगरे (ता. मिरज) हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेले गाव आहे. लोकसंख्या साडेसहा हजारांपर्यंत आहे.
कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने शेती कोरडवाहू होती. पैशांची चणचण असल्याने मजुरीवर सारी भिस्त होती.
काळ होता पन्नास साठ वर्षांपूर्वीचा. दुष्काळ असला तरी इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात एक ते दोन खिलार गायी आढळायच्या.
या परंपरेतूनच जातिवंत देशी खिलार पैदास करून खोंडांची विक्री करण्याच्या व्यवसायाचा मार्ग गावाला मिळाला.
राज्यात कुठेही जा, बैलगाडा शर्यत ही शौकिनांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. अशा शर्यतीच्या अनेक अड्ड्यांवर सलगरे गावातून खोंड घेतल्याची माहिती मिळते.
अशा प्रकारे ‘माउथ टू माउथ’ प्रसिद्धीतून शर्यतीसाठी खात्रीशीर खोंड मिळणारे गाव अशी सलगरेची सर्वदूर प्रसिद्धी झाली आहे.
सातारा, पुणे, कोकणासह कर्नाटकातील बेळगावसह विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बागलकोट ते अगदी कोलकाता येथूनही या बैलाना मागणी असते.
खोंड खरेदी करताना कान, शिंग, बारीक शेपूट, तोंडावर कोसा, चित्रा, काळा हरणा, पांढरा असे रंग पाहिले जातात.
आजमितीला गावात ५०० हून अधिक खिलार गायींचे संगोपन होते. शेतकऱ्यांच्या दावणीला पाच ते १० पर्यंत गायींची संख्या आढळते. वर्षभरात सुमारे २०० ते ३०० पर्यंत खोंडांची विक्री होत असावी.