Team Agrowon
गायी, म्हशी, बैल, शेळी व मेंढ्यांमध्ये रेबीज आजार हा पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्यामुळे होतो. काहीवेळा पिसाळलेला कोल्हा, लांडगा जंगल सीमा ओलांडून जनावरांना चावा घेतात.
रेबीज हा आजार, रेबीज विषाणूग्रस्त श्वान, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस व इतर कुठल्याही प्राण्यांनी चावा घेतल्यास, त्याच्या लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून मानव तसेच जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात.
रुग्णांनी लक्षणे दाखवण्यासाठी लागणारा वेळ, चावा घेतलेली जागा, मेंदूपासून किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते.
साधारणपणे मोठ्या गायी, म्हशी, बैलांमध्ये मानेच्या वरच्या भागास पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यास लक्षणे विसाव्या दिवशी चालू होतात.
जनावरे २ ते ३ दिवसांत दगावतात. वासरांमध्ये लक्षणे पंधराव्या दिवशी सुरू होतात. ही लक्षणे ०,३,७,१४ व २८ व्या दिवशी देण्यात येणाऱ्या लसीकरणानंतर सुद्धा दिसून येतात.
जनावरांमध्ये मानेच्या वरच्या भागास पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यास फक्त लसीकरण प्रभावी ठरत नाही.
ज्या भागात रेबीजचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी जनावरांच्यामध्ये अनेकदा अधिवस्था (स्पिलओव्हर) संसर्ग होतो.