Mahesh Gaikwad
कैदी म्हटलं की पांढरा पायजमा, शर्ट, टोपी असा पेहराव केलेले, जेवणाच्या रांगेत उभे किंवा कारागृहात आपसांत हाणामारी करणारे अशी दृश्ये चित्रपटातून आपण पाहिलेली आहेत.
पण याच कैद्यांच्या आयुष्याला कारागृहात योग्य दिशा मिळावी. त्यांनाही सुधारण्याची संधी मिळावी, या हेतूने शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना शेतीत रमविण्याचा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग कारागृह अधिक्षक राजेंद्र टोणगे यांनी राबविला आहे.
शिक्षेतून मुक्तता झाल्यानंतर कैदी भावी आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतील या हेतूने टोणगे यांनी कैद्यांना शिस्त लावली.
कारागृहातच कैद्यांना वाफे बनवणे, शेणखत, पाणी देणे इथंपासून ते काढणीयोग्य फळे कशी ओळखावीत, विक्री कशी करावी इथपर्यंतचे सगळे शेतीचे धडे दिले जातात.
या कारागृहात सुमारे १०० कैदी आहेत. त्यापैकी ३० ते ४० कैदी शेतीत राबतात. कारागृहातील कैद्यांना कौशल्य ओळखून काम देण्यात येते.
या कारागृहात पालक, मुळा, मेथी, माठ, मुळा, पडवळ, दोडका, दुधी, भोपळा, काकडी, कारले, भेंडी, गवार, मिरची, वांगी आदी विविध भाज्यांचे उत्पादन कैदी घेतात.
जिल्हा कारागृहातील तसेच सावंतवाडी, रत्नागिरी कारागृहांतील कैद्यांना येथून भाजीपाला पुरविला जातो. जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला भाजीपाला पुरविण्याची मागणीही आली आहे.
कैद्यांना नियोजन समितीकडून पॉवर टिलर देण्यात आला. जिवामृत निर्मितीसाठी दोन गायींची खरेदी करण्यात आली. जिवामृत बनविण्याचे प्रशिक्षण कैद्यांना देण्यात आले.