Team Agrowon
कोरडवाहू भागातील जमिनी या काळ्या आणि भारी असतात. अशा जमिनीत चिकणमातीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असते. जमिनीची खोली ६० ते ९० सेंमीपर्यंत असते.
या जमिनीतील ओलीचे प्रमाण कमी होताच, भेगा पडण्यास सुरुवात होते. आणि जमीन कठीण बनते. अशा जमिनीची नांगरट प्रत्येक वर्षी केल्याने जमिनीच्या कण रचनेवर विपरीत परिणाम होतो.
जमीन प्रमाणापेक्षा जास्त पोकळ राहते. ज्वारी, बाजरी यांसारख्या लहान आकाराचे बियाणे असलेल्या पिकांची उगवणशक्ती कमी होते.
बियाणे, माती आणि पाणी यांचा संपर्क तसेच जमिनीतील ओलावा आणि तापमानाचा एकत्रित परिणाम बियाणाच्या उगवणशक्तीवर होतो. म्हणून भारी, काळ्या जमिनीची तीन वर्षांतून एकदाच नांगरट करावी.
कोरडवाहू शेतीमध्ये ४५ सेंमी खोलीपर्यंतच्या जमिनीत तूर अथवा सूर्यफुलासारखी पिके घेतल्यानंतर पुढील हंगामापर्यंत जमिनी मोकळ्याच असतात.
अशा जमिनीची नांगरट ही पिके निघताच जमिनीत ओल असेपर्यंत हिवाळी हंगामात पूर्ण करावी. म्हणजे काम जलद गतीने आणि कमी कष्टात होते.
नांगरट उताराला आडवी करावी. जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल.