Team Agrowon
साखर उद्योगातील विविध संस्थांनी यंदा साखर उत्पादन अपेक्षे इतके घटणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतरही केंद्र शासन अजूनही इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी साखरेस आणखी परवानगी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र आहे.
सध्या या हंगामातील १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये देश पातळीवरील विविध संस्थांनी केंद्राकडे इथेनॉलकडे साखर वळवण्यास आणखी परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे.
जरी उत्पादनाचे अंदाज साखर उद्योगातील संस्थानी दिले असले तरी केंद्रीय सूत्रांनी अद्यापही त्यावर विचार केलेला नाही.
जोपर्यंत केंद्राची पुरेशा साखर उत्पादनाबाबत खात्री होत नाही तोपर्यंत वाढीव परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.
येणाऱ्या एक, दोन महिन्यांमध्ये निवडणुकांचा कालावधी असल्याने केंद्र शासन खुल्या बाजारात साखरेचे दर वाढविण्यासाठी पूरक गोष्टींना परवानगी देणे अशक्य असल्याचे अन्न सार्वजनिक पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.