Mahesh Gaikwad
देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा सामना सामान्यांना करावा लागत आहे. सुर्याच्या आग ओकणाऱ्या उष्णतेमुळे नागरीक हैराण झाले आहेत.
वाढत्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. असे असताना याच दरम्यान देशातील सामान्य नागरीक आणि विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे.
देशात यंदा ३१ मे रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
मात्र, मॉन्सूनने सर्वांनाचा सुखद धक्का देत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
हवामान विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे. मॉन्सूनने वेळे आधीच एन्ट्री घेतल्यामुळे वाढत्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशात मॉन्सून दाखल झाल्यानंतर येत्या पाच दिवसांमध्ये उत्तर-पूर्व भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील सध्याचा तापमानाचा पारा पाहता मॉन्सूनच्या आगमनाचे वृत्त सर्वांसाठी आनंददायी आहे.
यंदाच्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच दिला आहे.