Team Agrowon
दरवर्षी अर्धे बिहार पुराच्या पाण्याखाली असते, तर अर्ध्या भागात दुष्काळ पाचवीला पुजलेला. येथे शेतीपेक्षाही दिसतात ती हजारो लहान-मोठी तळी, प्रचंड दलदल आणि वाहते पुराचे पाणी.
खरीप आणि रब्बीचे क्षेत्र अनेक वेळा कायम पाण्याखालीच असते. अनेक भागांमधील मका, भात, गहू शेती केव्हाच बंद झाली आहे. त्याची जागा ‘मखाना’ या पिकाने घेतली आहे.
पूर, दलदलीमुळे शेतामध्ये मोठमोठी तळी निर्माण होतात. या तळ्यात हे ‘फॉक्स नट’ म्हणजे काटेरी वॉटर लीलीचे उत्पन्न घेतले जाते.
पाण्यावर तरंगणारी मोठमोठी गोलाकार काटेरी पाने, निळसर फुले आणि याची फळे पाण्याखाली येतात. त्यामध्ये गोलाकार बिया असतात. या बियांपासून गोलाकार मोठ्या लाह्या म्हणजेच मखाणा केल्या जातात.
चीन, जपान, कोरियामध्ये मखाना मोठ्या प्रमाणावर पिकतो. पण जगामधील ९० टक्के मखाना उत्पादन बिहारमध्ये होते. तब्बल ८५ हजार हेक्टरवर आज याचे उत्पादन घेतले जाते.
भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे बिहारसाठी मखानाचे खास सुधारित वाण उपलब्ध केले आहेत. बिहार शासनातर्फे शेतकऱ्यांना मखाना शेतीसाठी अनुदानही मिळते.
प्रति हेक्टरी अंदाजे एक लाख तीस हजार रुपये नफा मिळवून देणारे हे पीक म्हणजे बिहारी शेतकऱ्यांनी वातावरण बदलास दिलेले चोख उत्तर आहे.
उन्हाळ्यामध्ये मखाना उत्पादक शेतकऱ्याचे घर शेकडो पोती लाह्यांनी भरलेले असते. संपूर्ण कुटुंबाला रोजगार देणारी ही शेती आहे.