Anuradha Vipat
भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य ८ पत्न्यांना 'अष्टभार्या' म्हणून ओळखले जाते.
हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांनुसार, श्रीकृष्णाचे हे आठ विवाह वेगवेगळ्या विवंचनेतून, धार्मिक कारणांमुळे आणि भक्तांच्या रक्षणासाठी झाले होते.
श्रीकृष्णाने विदर्भात जाऊन, मंदिराबाहेरून रुक्मिणीचे रथात हरण केले आणि द्वारकेत आणून तिच्याशी वैदिक पद्धतीने विवाह केला तर जांबवती या जांबवंताची कन्या होत्या. जेव्हा जांबवंतांना समजले की श्रीकृष्ण हेच त्यांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आहेत, तेव्हा त्यांनी क्षमा मागितली आणि तो स्यमंतक मणी आपली कन्या जांबवती हिला श्रीकृष्णाच्या स्वाधीन केले.
आपले पाप धुण्यासाठी आणि श्रीकृष्णाशी संबंध सुधारण्यासाठी राजा सत्राजितने स्वतःहून आपली अत्यंत रूपवान आणि धाडसी कन्या 'सत्यभामा' हिचा विवाह श्रीकृष्णाशी करून दिला. एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण यमुनेच्या काठावरून जात असताना त्यांना कालिंदी तपश्चर्या करताना दिसली. अर्जुनाने तिच्या तपश्चर्येचे कारण विचारले असता, तिने श्रीकृष्णाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने तिचा स्वीकार केला आणि तिच्याशी लग्न केले.
मित्रविंदा श्रीकृष्णावर प्रेम करत होती, पण तिचे भाऊ विंद आणि अनुविंद हे कौरवांचे मित्र असल्याने ते तिच्या विवाहाच्या विरोधात होते. त्यांनी मित्रविंदासाठी जबरदस्तीने स्वयंवर आयोजित केले. परंतु, मित्रविंदाच्या संमतीने श्रीकृष्णाने स्वयंवर मंडपातून तिचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला. लक्ष्मणाचा विवाह हा द्रौपदीच्या स्वयंवरासारखाच होता. श्रीकृष्णाने अत्यंत सहजतेने लक्ष्याचा वेध घेतला आणि मद्र राजकुमारी लक्ष्मणाला आपली पत्नी बनवले.
कोसल देशाचा राजा नग्नजित याने आपली कन्या नाग्नजिती हिच्या विवाहासाठी एक अजब अट ठेवली होती. जो वीर पुरुष त्याच्या अत्यंत आक्रमक आणि उन्मत्त अशा ७ बैलांना एकाच वेळी एकाच दोरीने वेसण घालेल, त्यालाच त्याची कन्या वरेल. अनेक वीरांना त्या बैलांनी जखमी केले होते. श्रीकृष्णाने स्वतःची ७ रूपे धारण केली आणि एकाच क्षणात साताही बैलांना वेसण घालून नमवले. राजाने आनंदाने आपल्या कन्येचा विवाह श्रीकृष्णाशी लावून दिला.
भद्रा ही लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होती. तिचे भाऊ संतर्दन आणि इतर भावंडांनी तिची इच्छा ओळखून स्वतःहून श्रीकृष्णाला द्वारकेत आमंत्रित केले आणि पूर्ण विधीवत पद्धतीने भद्राला श्रीकृष्णाची आठवी राणी बनवले.