Team Agrowon
खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे जमीन नांगरली जाते.
पिकांची काढणी झाल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च–एप्रिलमध्ये लगेच नांगरणी करावी. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.
पाऊस पडतो तेंव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.
खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन जमिनीच्या वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून उष्णता जमिनीस पोषक ठरते. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. याशिवाय कडक झालेली जमीन भुसभूशीत होऊन जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
नांगरटीचा उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते.
नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग, किडींच्या सुप्तावस्था, कोष नष्ट होतात. त्यामुळे उ्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतीशय महत्वाची आहे.