Team Agrowon
आपल्याकडील जमिनीत पिकांचे नियोजन करताना पिकांची फेरपालट करावी. यामध्ये एकदल नंतर द्विदलवर्गीय पिकांचा क्रम असावा. या पिकांच्या मुळांची रचनाही पाहावी. म्हणजे जमिनीच्या एकाच थरातील अन्नद्रव्ये घेतली जात नाहीत.
द्विदल पिकांच्या मुळांवरील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्मजिवाणूंमुळे सुपीकता वाढते. तसेच या पिकाचा पालापाचोळा वाळून वरच्या थरात मिसळला जातो. त्याचे बेवड चांगले होऊन पुढील एकदल पिकाला चांगला फायदा होतो.
बहुतांशी शेतकरी मक्यावर-मका, तुरीवर-तूर, सोयाबीन-सोयाबीन, ऊस-ऊस, कांद्यावर कांदा अशा प्रकारे पीक पद्धती अवलंबतात. परिणामी रोग व किडींचे चक्र अव्याहत सुरू राहते. प्रादुर्भाव वाढून नियंत्रण खर्चातही वाढ होते.
खरीप हंगामातील पिकांना पेरणीवेळी खताचा बेसल डोस द्यावा. म्हणजे पिकांना बाळसे चांगले येते. बेसलडोसमध्ये शिफारशीत नत्रापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीवेळी द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर एक महिन्यांनी शक्यतो गाडून द्यावे.
पेरणीनंतर उभ्या पिकात जास्त पाऊस पडल्यास निचऱ्याची व्यवस्था करावी. थोडीशी उघडीप मिळाल्यास सायकल कोळपे दोन ओळींत मारावे.
खरीप हंगामात उभ्या पिकांत द्विदलवर्गीय पिकांमध्ये मर दिसत असल्यास त्याची कारणे शोधून वेळीच उपाययोजना कराव्यात. १५ दिवसांच्या आत नांग्या भराव्यात.
शक्यतो तणनाशकांचा कमीत कमी वापर उभ्या पिकात करावा. वापर करण्यापूर्वी तणनाशकांचा प्रकार उगवणपूर्व आहे की उगवणीनंतर करायचा, याची माहिती पॅकिंग व सोबत असलेल्या लेबल वाचून मिळवावी.