Team Agrowon
वंध्यत्व म्हणजे जनावरांची पुनरुत्पादन करण्यास असमर्थता किंवा गर्भधारणा करण्यास असमर्थता. हे वंध्यत्व पूर्णतः किंवा अंशतः असू शकते.
मादी पुनःपुनः माजावर येणे हे अंशतः वंध्यात्वाचे प्रमुख लक्षण आहे. याची अनेक कारणे असू शकतात. अयोग्य आहार किंवा आहारात खनिजांची कमतरता हे मुख्य कारण आहे.
काही वेळा पूर्ण वंध्यत्व आनुवंशिक कारणांनीसुद्धा होऊ शकते. याकडे आपण दुर्लक्ष करतो. आनुवंशिक तपासणी बरोबर प्रजनन व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
जनुके ही डीएनएची बनलेली असतात. जर डीएनएमध्ये दोष निर्माण झाले, तर शरीर योग्य प्रमाणात प्रथिने बनवू शकत नाही. काही जनुके प्रजननक्षमतेशी संबंधित असतात. म्हणूनच जनुक दोषांमुळे वंध्यत्व निर्माण होते.
रेतनाच्या काळात पोषक तत्त्वांच्या अभावामुळे कमकुवत पिढी तयार होते, यामध्ये पुनरुत्पादन क्षमतेचा आभास जाणवतो. जनावरांमधील माज वेळेवर ओळखणे आणि योग्य वेळी रेतन करणे महत्त्वाचे आहे.
मोठ्या कळपात निवड प्रक्रियेमुळे आणि छोट्या कळपात इन्ब्रीडिंगमुळे आनुवंशिक बदल होतात. निवड प्रक्रियेमुळे सकारात्मक आणि इन्ब्रीडिंगमुळे नकारात्मक बदल कळपात होतात.
प्रत्येक प्राणिमात्रात गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रांवर जनुके असतात. यामुळे दुग्ध उत्पादन, मांस उत्पादन, अंडी उत्पादन अवलंबून असते.