Team Agrowon
खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी फळाच्या गराचा उपयोग केला जातो.
खरबुजापासून दर्जेदार पदार्थनिर्मितीसाठी योग्यवेळी काढणी, साठवण आणि प्रक्रियेसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
फळे काढणीस आल्यानंतर पहिल्या दोन ते तीन तोडण्या एक दिवसाच्या अंतराने केल्या जातात. त्यानंतर पुढील २० ते २५ दिवसांपर्यंत दरराेज तोडणी केली जाते.
दोन तोडण्यांमधील अंतर हे वेलीची सुदृढता, फळांची संख्या, हंगाम व बाजारभाव यांचा अंदाज घेऊन ठरविले जाते.
तयार रोपांची लागवड आणि प्लॅस्टिक आच्छादन केलेल्या पिकातील फळे ही बियांपासून लागवड केलेल्या पिकापेक्षा ७ ते १४ दिवस लवकर काढणीसाठी येतात.
पूर्ण पक्व झालेली फळे वेलीपासून अलग होतात. त्यांच्यात साखरेची अत्युच्च पातळी असते.
पक्वतेनंतर लवकरात लवकर फळे न खाल्ल्यास किंवा शीतगृहात न ठेवल्यास त्यांच्यातील साखर व फळांच्या दर्जात वेगाने घट होण्यास सुरवात होते.