Team Agrowon
एकेकाळी जांभळाकडे रानमेवा म्हणून पाहिले जाई. जांभूळ म्हटले की गडद जांभळी- काळी रसाळ, काहीशी आंबट-गोड, काहीशी तुरट फळे डोळ्यासमोर येतात.
जांभूळ हे अत्यंत बहुगुणी, परंतु दुर्लक्षित असे सदाहरित फळझाड आहे. अलीकडे वाढत्या मधुमेहाच्या समस्येवर उपाय म्हणून त्याला फार महत्त्व आलेले दिसते.
जांभूळ फळ हे मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणा, किडनी स्टोन नियंत्रणासाठी गुणकारी आहे. लोह, कॅल्शिअम, प्रथिने, तंतुमय पदार्थ, कर्बोदके यांचा उत्तम स्रोत आहे.
फळाप्रमाणेच जांभळाच्या झाडाची पाने, साल व बियासुद्धा आरोग्यास फायदेशीर आहेत.
बियांमध्ये असलेले अल्कलाईड रक्तातील साखरेच्या नियंत्रणासह अनेक रोगांच्या उपचारात उपयोगी आहे. म्हणून जांभूळ बियांच्या भुकटीला मागणी वाढत आहे.
जांभूळ हे तसे नाशिवंत फळ असून, पिकल्यानंतर फार काळ टिकत नाही. जांभूळ म्हटले की पालघर जिल्ह्यातील बहाडोली व ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ही गावे आठवतात. तेथील जांभळांचा मोठा आकार व उत्तम चव ही त्यांची वैशिष्ट्ये.
पूर्वी जांभळाची फळे ही हंगामातच (जून ते जुलै) चाखायला मिळायची. आता प्रक्रियेतून विविध पदार्थांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. जांभळापासून रेसवेरा वाइन निर्मितीचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. त्यातूनही जांभूळ उत्पादकांना निश्चितच फायदा मिळू शकेल.