Swarali Pawar
सध्या रब्बी कांद्याचे पीक काढणीच्या टप्प्यावर आले आहे. उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यास कांद्याची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही टिकून राहतात.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त होतो. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि कांदा लवकर सुकण्याचा धोका वाढतो.
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी गरजेनुसार वेळेवर पाणी देणे आवश्यक आहे. परंतु अति पाणी दिल्यास कांद्याची वाढ आणि गुणवत्ता दोन्हीवर परिणाम होऊ शकतो.
कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्यावीत. ही फवारणी पुनर्लागणीनंतर साधारण ६० आणि ७५ दिवसांनी करावी.
फुलकिडे आणि रोग नियंत्रणासाठी कार्बोसल्फान २ मि.ली. आणि ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी.
कांद्यावर लाल कोळी दिसल्यास गंधक २ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. पर्याय म्हणून डायकोफॉल २ मि.ली. प्रति लिटर फवारणीही प्रभावी ठरते.
कांदा काढणीच्या सुमारे २० दिवस आधी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी बंद करावी. तसेच डेंगळे आलेले कांदे दिसल्यास ते लगेच शेतातून काढून टाकावेत.
पाने पिवळी पडून माना पडू लागल्यावर काढणीच्या १५–२० दिवस आधी पाणी बंद करावे. यामुळे कांदे घट्ट होतात आणि काढणीवेळी नुकसान कमी होते.