Team Agrowon
द्रव्याचे आकारमान जेवढे अधिक, तेवढा त्याचा बाष्पीभवनचा दर वाढत असतो. जास्त लांबी-रुंदी असणारे शेततळे न बांधता जास्त खोली असणारे शेततळे बांधावे.
शेततळ्याच्या बाजूने उंच व दाट झाडांचे कुंपण करावे. जेणेकरून वाहणाऱ्या वाऱ्याचे तापमान कमी होऊन उष्ण वाऱ्याद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होऊ शकेल.
शेततळ्याच्या आजूबाजूने तीन मीटर उंचीची भिंत बांधावी. उपलब्ध माती व मुरुमाचा वापर करून तात्पुरती भिंत उभारल्यास हरकत नाही. परंतु भिंतीची उंची शेततळ्यापेक्षा जास्त असावी.
निंबोळी किंवा एरंडी या वनस्पतिजन्य तेलांचाही वापर बाष्पीभवन नियंत्रणासाठी करता येतो. संपूर्ण शेततळ्यामधील उपलब्ध पाण्याच्या पृष्ठभागावर या तेलांचा तवंग पसरवून बाष्पीभवन रोखता येते.
सध्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आली आहे. थर्माकोलचे तुकडे शेततळ्यात सहजपणे पसरविता येतात. त्याचा वापर जास्त कालावधीसाठी करता येऊन त्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
केओलिन हे खडूच्या भुकटीसारखे रसायन आहे. सुमारे एक कोटी लिटर पाण्यासाठी तीन किलो भुकटी लागते. या रसायनाचा टिकाऊपणा अत्यंत कमी असतो. प्रत्येक ८ ते १२ दिवसांमध्ये ही पावडर तळाशी जाते.
पालापाचोळा, तांदळाचा भुस्सा, गव्हाचे काड, हलके फ्लोटिंग ऑब्जेक्ट्स, पीव्हीसी बॉल्स, प्लॅस्टिक आदींचे आच्छादन; शेवाळ-जलपर्णी संवर्धन, विविध रंगांचा वापर तसेच शेततळ्यावर कापडाच्या आवरणाचा वापर करूनही शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करता येते.