Team Agrowon
गेल्या महिन्यात दबाव आल्यानंतर अंडी दरात तेजी अनुभवण्यात आली. ही दरातील तेजी आताही कायम असून ५०६ ते ५१० रुपये प्रती शेकडा असा दर अंड्यांना मिळत असल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली.
राज्याची रोजची अंडी मागणी सरासरी एक कोटीच्या घरात आहे. तर दुसरीकडे शेतीपूरक तसेच स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ही ९ लाख आहे. त्यामुळे राज्यातील अंड्यांची गरज पूर्ण होत नसल्याने देशातील इतर भागातून देखील अंडी राज्यात दाखल होतात.
सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने कोंबड्या जगविण्याचे मोठे आव्हान लेअर पोल्ट्री व्यावसायिकांसमोर आहे. पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.
तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्री व्यवसायिकांना अनेक उपाययोजनांवर भर द्यावा लागत आहे. त्यानंतर देखील तापमान नियंत्रण साधले जात नसल्याने मर्तुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे.
जास्त तापमानाचा अंडी उत्पादनावर परिणाम झाल्याने अंड्याचे दर वधारले आहेत. सध्या अंड्यांना ५०६ ते ५१० रुपये प्रतिशेकडा दर मिळत आहे.
एप्रिल महिन्यापर्यंत अंड्यांचे दर ३०० रुपयांवर होते. परिणामी उत्पादकता खर्चही निघत नव्हता, अशी स्थिती होती.
तापमानात वाढीच्या परिणामी मर्तुक वाढल्याने हे दर आता वाढले आहेत. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.