Team Agrowon
उत्तम जेवण झाल्यावर ‘ढेकर येणे'' हे व्यवस्थित पोट भरण्याचे लक्षण आहे. ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण बऱ्याचदा दिवसभर सारखे ढेकर येत राहतात.
कधी आंबट, करपट तर कधी नुसतेच तर कधी खाल्लेल्या अन्नाची ढेकर येते. ढेकर नाही अाली तर त्या व्यक्तीला फार अस्वस्थ वाटते आणि पोटात जडपणा जाणवतो. सारखे ढेकर येणे विकृतीचे लक्षण आहे.
सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जेवणाची वेळ चुकणे! आपल्या घरी सणवार असल्यास कामाच्या नादात काही न खातापिता चहाचा मारा केला जातो.
अवेळी उशिरा केलेले जेवण नीट पचत नाही आणि गॅसेस होतात, ते ढेकरद्वारे बाहेर पडतात.
चहा रिकाम्या पोटी घेतल्याने पित्त वाढते. परिणामी, कधी आंबट ढेकरही येतात. सण वारा व्यतिरिक्तसुद्धा अधूनमधून बऱ्याचदा ढेकर येण्याचा त्रास अनेकांना होताना दिसतो.
मलावरोध, उपवासाचा अतिरेक, कोरडे जेवणे, चणे फुटाणे, तसेच सतत फरसाण, चुरमुरे खाण्याची सवयही आपल्या नकळत कारणीभूत ठरते.
कितीही कामाचा व्याप असला तरी सकाळची न्याहारी झालीच पाहिजे. रिकाम्या पोटी चहा कॉफी कधी घेऊ नये.
वारंवार ढेकर येणे हा त्रास जुना असला तर नियमितपणे औषधे घ्यावी. वातूळ पदार्थ, भेळ फुटाणे शक्यतो टाळावेत, पोट साफ ठेवावे.