Team Agrowon
सध्या लाकडी घाण्याच्या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबियांचे लाकडी घाण्यामधून तेल काढले जाते.
फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते.
घाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण असते. त्यामुळे काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबाबतची जागरूकता निर्माण करते.
यांत्रिक पद्धतीने तेल काढताना तापमान ४०० ते ७०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. या वाढलेल्या उष्णतेमुळे अनेक पोषक घटक नष्ट होतात.
कोल्ड प्रेस प्रक्रियेत ४० अंशांपेक्षा कमी तापमानात तेल काढले जाते. यामुळे तेलातील ओलेईक ॲसिडसारखी अनेक महत्त्वाची मेदाम्ले, ॲण्टिऑक्सिडेण्ड घटक, जीवनसत्त्व इ, जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व सी इ. नष्ट होत नाही. असे तेल आरोग्यासाठी चांगले असते.
हृदयरोगापासून बचावासाठी उच्च तापमानामध्ये तयार झालेले तेल टाळण्याचा सल्ला वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञ देतात. परिणामी, लाकडी तेलघाण्यावर गाळलेल्या तेलाला मागणी वाढत आहे.