
औरंगाबाद: ‘‘शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा’’, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ‘उभारी २.०’ कार्यक्रम राबविण्यासाठी बैठक घेण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, स्वयंसेवी संस्थेचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या होऊच नयेत, या साठी सर्वच यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात जागृती निर्माण करावी. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पीडित कुटुंबांची जबाबदारी ३१ मे पर्यंत अधिकारीनिहाय देण्यात यावी. मदत करण्यासाठी सर्व यंत्रणांना सामावून घ्या. कुटुंबाची गरज ओळखून त्यांना आर्थिक, कृषीमध्ये समृद्ध करा. जोडव्यवसाय, रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण द्या.’’ डॉ. गव्हाणे म्हणाले, ‘‘उद्योजकांशी समन्वय साधून सीएसआर निधीतून मदत करण्याबाबत विचार करावा.’’
जाधवर म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला विविध माध्यमातून साहाय्य करावे. महसूल अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना त्यांची गरज ओळखून संपूर्णतः मदत मिळावी, यासाठी काही कुटुंबे दत्तक घ्यावीत. तालुकास्तरावर समन्वय समिती स्थापन करावी. पीडित कुटुंबांना कायमस्वरूपी आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.’’ पाटील यांनीही सविस्तर माहिती सादर केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.