Team Agrowon
निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व लांबत चाललेला पाऊस, तसेच वातावरणातील बदल, अवेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादनाबरोबरच काळ्याभोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झाला आहे.
दरवर्षी गावरान जांभूळ बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते; मात्र जांभळाचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चाललेला आहे.
जांभूळ पिकण्याचा कालावधी लांबत जाऊन जून महिना उजाडतो. पावसामुळे जांभळे खराब होऊन नुकसान सहन करावे लागते.
यंदा जांभूळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व ५० ते ६० टक्के उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार शेतकरी वर्गाने सांगितले.
या वर्षी अवकाळी पाऊस व बदललेले वातावरण यांचा मोठा परिणाम जांभूळ पिकावर झाला आहे. एप्रिल महिना उजाडला तरी विक्रमगड तालुक्यात जांभूळ पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा झालेली नाही.
जानेवारी महिन्यात जांभळांच्या झाडांना मोहर येत असतो; परंतु यंदा मोहर लांबला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे मोहर व लहान फळेही गळून पडली आहेत.